दुसरे महायुद्ध
From Wikipedia
दुसरे महायुध्द हे १९३९ ते १९४५ दरम्यान चालले. हे युध्द मुख्यतः युरोप व एशियामध्ये दोस्त राष्ट्रे (Allied forces) व अक्ष राष्ट्रे (Axis powers) यांच्या मध्ये झाले. दोस्त राष्ट्रांमध्ये ज्यामध्ये फ्रांस, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली, व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युध्दामध्ये सहा कोटीच्यावर जिवीत हानी झाली. मनुष्याच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जिवित हानी आहे. या युध्दामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
अनुक्रमणिका |
[संपादन] आढावा
[संपादन] युरोप
सप्टेंबर १, १९३९ रोजी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. जर्मनीचा नेता एडॉल्फ हिटलर व त्याच्या नाझी पक्षाने सोवियेत संघाशी त्यापूर्वी मैत्री-करार केला होता. त्यानुसार सोवियेत संघाने सप्टेंबर १७च्या दिवशी पूर्वेकडून पोलंडवर चाल केली. याला प्रत्युत्तर म्हणून युनायटेड किंग्डम व फ्रांसने सप्टेंबर ३ला जर्मनीविरुद्ध युद्ध जाहीर केले. सुरुवातीला हे युद्ध मुख्यत्त्वे सागरी युद्ध होते. काही महिन्यातच जर्मनीने पोलंड काबीज केले. त्यानंतर १९४०मध्ये जर्मन सैन्याने नॉर्वे, नेदरलँड्स, बेल्जियम व फ्रांस पादाक्रांत केले व १९४१मध्ये युगोस्लाव्हिया आणी ग्रीसचा पाडाव केला. इटलीने उत्तर आफ्रिकेतील ब्रिटीश वसाहतींवर हल्ला केला. काही महिन्यांनी त्यांना जर्मन सैन्याची कुमक मिळाली. १९४१च्या मध्यापर्यंत जर्मनीने बहुतांश पश्चिम युरोप आपल्या टाचेखाली आणले होते परंतु युनायटेड किंग्डम जिंकणे त्यांना जमले नाही. याचे मुख्य कारण होते रॉयल एर फोर्स व रॉयल नेव्हीने दिलेली कडवी झुंज.
आता हिटलर सोवियेत संघावर उलटला व जून २२, १९४१ रोजी त्याने अचानक सोवियेत संघावर चाल केली. ऑपरेशन बार्बोरोसा या सांकेतिक नावाने योजलेल्या या मोहिमेत जर्मनीला सुरुवातीला भरभरुन यश मिळाले. १९४१ शेवटीशेवटी जर्मन सैन्याने मॉस्कोपर्यंत धडक मारली परंतु येथे ही मोहीम अडकून पडली. सोवियेत सैन्याने कडवा प्रतिकार करीत जर्मनीचा रेटा मोडून काढला. पुढे सोवियेत सैन्याने स्टालिनग्राडला वेढा घालुन बसलेल्या जर्मनीच्या सहाव्या सैन्यालाच प्रतिवेढा घालुन पूर्ण सैन्याला युद्धबंदी बनवले. कुर्स्कच्या युद्धात सोवियेत सैन्याने जर्मनीचा प्रतिकार मोडून काढला व लेनिनग्राडचा वेढा उठवला. जर्मन सैन्याने अखेर माघार घेतली. लाल सैन्याने त्यांचा बर्लिनपर्यंत पाठलाग केला. बर्लिनमध्ये जर्मन सैन्याने व सामान्य नागरिकांनी घराघरातून सोवियेत सैन्याला झुंज दिली परंतु प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या कुमकीच्या जोरावर सोवियेत सैन्याने बर्लिन जिंकले. याच सुमारास (एप्रिल ३०, १९४५ रोजी) हिटलरने आपल्या भूमिगत बंकरमध्ये आत्महत्त्या केली.
इकडे पाश्चिमात्य दोस्त राष्ट्रांनी १९४३मध्ये इटलीवर चाल केली. १९४४मध्ये त्यांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर हल्ला केला व फ्रांसला जर्मन आधिपत्यातून मुक्त केले. जर्मनीने चढवलेल्या प्रतिहल्ल्याला ऱ्हाईन नदीच्या किनाऱ्यावर बॅटल ऑफ द बल्ज नावाने प्रसिद्ध लढाईत दोस्त राष्ट्रांनी जबरदस्त उत्तर दिले व येथून आगेकूच करीत त्यांनी जर्मनी गाठले आणी एल्ब नदीच्या किनाऱ्यावर पूर्वेकडून चालून आलेल्या सोवियेत सैन्याशी संधान बांधले. यावेळी जर्मनीच्या उरल्यासुरल्या सैन्याने शरणागती पत्करली व हार मान्य केली.
युरोपमध्ये चाललेल्या या धुमश्चक्रीदरम्यान जर्मन राष्ट्राकडून चालविण्यात आलेल्या वंशहत्येत ६०,००,००० ज्यू व्यक्तिंचा बळी गेला. याला ज्यूंचे शिरकाण अथवा हॉलोकॉस्ट म्हणण्यात येते.
[संपादन] एशिया व पॅसिफिक समुद्र
युरोपमध्ये युद्धाला तोंड फुडण्यापूर्वी जपानने जुलै ७, १९३७ रोजी चीनवर आक्रमण केले. जपानचा रोख चीनमधून पूर्व आणी आग्नेय एशियावर स्वारी करीत एकएक देश जिंकायचा होता. यात मिळालेल्या यशानंतर जपानने डिसेंबर ७, १९४१च्या दिवशी अनेक राष्ट्रांवर एकाच वेळी हल्ला केला. याच दिवशी पर्ल हार्बर येथे अमेरिकेच्या नौदलावरही हल्ला चढवला गेला. याला प्रत्युत्तर म्हणुन अमेरिकेने युद्धात उतरण्याचे निश्चित केले.
पुढील सहा महिने जपानला घवघवीत यश मिळाले पण कॉरल समुद्राच्या लढाईत अमेरिकन नौसैन्याने त्यांचा प्रतिकार केला व मिडवेच्या लढाईत जपानने हार पत्करली. यात जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवुन अमेरिकेने जपानी नौसैन्याचा कणाच मोडला. येथून दोस्त राष्ट्रांनी जपानवर प्रतिहल्ला चढवला व मिल्ने बे व ग्वादालकॅनालच्या लढाईत त्यांनी विजय मिळवला. नैऋत्य पॅसिफिकमध्ये विजयी ठरलेल्या दोस्त राष्ट्रांनी मग पॅसिफिक समुद्राच्या मध्य भागावर रोख धरून मोहीम काढली. यात जपानी सैन्याने त्यांचा कडवा प्रतिकार केला. या मोहीमेदरम्यान फिलिपाईन समुद्राची लढाई, लेयटे गल्फची लढाई, इवो जिमा व ओकिनावाची लढाई, इ. अनेक भयानक सागरी युद्धे खेळली गेली.
या दरम्यान अमेरिकन पाणबुड्यांनी जपानकडे जाणारी रसद तोडण्यात यश मिळवले. याने जपानची आर्थिकदृष्ट्या कुचंबणा होउ लागली. १९४५मध्ये दोस्त राष्ट्रांच्या वायुदलाने जपानवर अनेक वादळी हल्ले चढवले. मुख्यत्त्वे नागरी वस्त्या व कारखान्यांवर झालेल्या या हल्ल्यांनी जपानची युद्धप्रवण राहण्याची शक्ति कमी झाली.
अखेर ऑगस्ट ६, ई.स. १९४५ रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर परमाणु बॉम्ब टाकला. ऑगस्ट ९ला अमेरिकेने नागासाकी शहरावर असाच हल्ला केला व जोपर्यंत जपान शरण येत नाही तोपर्यंत एक एक करीत जपानी शहरे बेचिराख करण्याची धमकी दिली. जपानने ऑगस्ट १५, १९४५ रोजी बिनशर्त शरणागती पत्करली व दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतरीत्या अंत झाला.
[संपादन] पर्यवसान
या अतिभयानक युद्धात अंदाजे ६,२०,००,००० (सहा कोटी वीस लाख) व्यक्ती मरण पावल्या. हे म्हणजे जगाच्या त्यावळेसच्या लोकसंख्येचे २.५% होय. अर्थात, हा केवळ अंदाज आहे व प्रत्येक राष्ट्राचे अंदाज वेगवेगळे आहेत. युरोप आणी एशियामधील देशच्या देश यात बेचिराख झाले. त्यातून सावरायला त्यांना पुढील अनेक दशके घालवावी लागली. दुसऱ्या महायुद्धाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक तसेच तंत्रज्ञानाच्या दृष्टीने जगावर झालेले प्रभाव आजदेखील दिसून येतात.
[संपादन] कारणे
जर्मनीचे पोलंडवरील आक्रमण व जपानचे चीन, अमेरिका व ब्रिटीश आणी डच वसाहतींवरचे आक्रमण ही दुसऱ्या महायुद्धाची कारणे समजली जातात. जगाच्या दोन्ही बाजूच्या या घटनांचे कारण होते जर्मनी व जपानमधील हुकुमशाही सत्ताधीश व त्यांची जगज्जेते होण्याची महत्त्वाकांक्षा. जरी या दोन्ही सत्तांनी आपले पाय पसरवण्यास आधीच सुरुवात केली असली तरी दुसऱ्या महायुद्धाची अधिकृत सुरुवात झाली ती या झोंडशाहीला झालेल्या सशस्त्र विरोधाने.
जर्मनीत नाझी पक्ष जरी लोकशाही मार्गाने सत्तेवर आला असला तरी एकदा हातात सत्ता आल्यावर पक्षाधिकाऱ्यांनी जर्मनीतील लोकशाही व्यवस्थेची लक्तरे काढली. असे असून जर्मन जनतेने त्यांना पाठिंबा दिला कारण पहिल्या महायुद्धात पराभूत झाल्यावर त्यांना जर्मन स्वाभिमानाला जागे करणारे सरकार प्रथमतःच मिळालेले होते. पहिल्या महायुद्धात शरणागती पत्करताना व्हर्सायच्या तहातील २३१वे कलम जर्मन जनतेला असह्य झाले होते. या शिवाय साम्यवाद-विरोध आणी आर्थिक सुबत्ता व प्रगतीच्या वचनांना भुलुन जर्मनीने नाझी पक्षाला व पर्यायाने एडॉल्फ हिटलरला अमर्याद सत्ता बहाल केली. हिटलरने जर्मनीला आपल्या हक्काच्या समजल्या जाणाऱ्या सगळ्या देशांना जर्मन सत्तेखाली आणण्याचे वचन दिले व त्यादृष्टीने पावलेही उचलली. नाझी पक्षाने (व स्वतः हिटलरनेही) हिटलरला जर्मनीचा तारणहार असल्याचे भासवले, व येथून एका भस्मासुराचा जन्म झाला.
इकडे जपानमध्ये क्रिसँथेमम (जास्वंदी) वंशाच्या राजांचे राज्य असले तरी खरी सत्ता होती ती सैन्यातील अत्त्युच्च अधिकाऱ्यांच्या टोळक्याकडे. जपानला जगातील महासत्ता करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. जपानने या नेतृत्त्वाखाली मांचुरियावर १९३१मध्ये व चीनवर १९३७मध्ये आक्रमण केले होते. यामागचे कारण होते ते चीन व मांचुरियातील नैसर्गिक संपत्ती बळकावून त्याद्वारे आपला प्रभाव अधिक मजबूत करणे. युनायटेड किंग्डम व अमेरिकेने या युद्धात जरी प्रत्यक्ष भाग घेतला नसला तरी त्यांनी चीनला आर्थिक व सैनिकी मदत केली. याशिवाय त्यांनी जपानविरुद्ध आर्थिक नाकेबंदी करीत जपानला मिळणारे खनिज तेल व इतर रसद कापली. यामुळे जपानला चीन व मांचुरियातील युद्ध जास्त काळ चालू ठेवणे अशक्य झाले व त्यांनी तेथून काढता पाय घेण्याची तयारी सुरू केली. आता जपानकडे उपाय होते म्हणजे चीनचा जिंकलेला प्रदेश परत करणे, खनिज तेल व इतर कच्च्या मालाची इतर पुरवठे शोधणे किंवा हे मिळवण्यासाठी अजून काही देश/प्रांत जिंकणे. आग्नेय एशियातील फिलिपाईन्स आणी डच, फ्रेंच व ब्रिटीश वसाहतींमधून या खनिजांचा मुबलक पुरवठा होता व हा भाग चीनमधून हल्ला करण्याच्या टप्प्यातही होता. जपानचा समज होता की एशियातील युरोपीय सत्ता युरोपमध्ये सुरू झालेल्या युद्धात गुंतल्या होत्या व एशियात लक्ष देण्याची त्यांना फुरसत नव्हती. सोवियेत संघ जर्मनीशी संधान बांधून असले तरी त्यांच्यात कुरबुर सुरूच होती आणी अमेरिका युद्ध करण्याआधी संधी/करार करण्याचा प्रयत्न करेल. ही परिस्थिती जपानने आग्नेय एशिया गिळंकृत करण्यास साजेशीच होती. हा अंदाज बांधून जपानने डच व ब्रिटीश वसाहतींवर आक्रमण केले व जगाच्या पूर्व भागातील युद्धाला तोंड फुटले.
सुरुवातीला तटस्थ असलेल्या अमेरिकेने दोस्त राष्ट्रांना जर्मनीविरुद्ध आर्थिक मदत करणे चालूच ठेवले होते. त्याला खीळ घालण्यासाठी जपानने डिसेंबर ७, १९४१रोजी अमेरिकेच्या पर्ल हार्बर येथील नौसेना तळावर जबरदस्त हल्ला केला व तेथील आरमार उद्ध्वस्त केले. अमेरिकेला आता युद्धात उतरणे भागच होते. अशा प्रकारे अमेरिकेचा या युद्धात प्रवेश झाला.
[संपादन] घटनाक्रम
[संपादन] युद्धाची सुरुवात - ई.स. १९३९
[संपादन] युरोपियन रणांगण
जर्मनीची आगळीक
१९३९च्या सुमारास जर्मनीने जाहीर केले होते की व्हर्सायच्या तहात गमावलेला सगळा प्रदेश जर्मनीने जिंकलाच पाहिजे. शिवाय, ज्या ज्या प्रदेशात जर्मनवंशीय व्यक्तींचे बहुमत असेल, ते प्रदेशही जर्मनीचेच भाग झाले पाहिजेत. जर्मनीच्या अधिकृत परराष्ट्र धोरणात म्हणले होते की पोलंड व चेकोस्लोव्हेकियातील काही प्रदेशात जर्मन बाहुल्य होते व तेथील जर्मनवंशीय व्यक्तींच्या हक्कांची पायमल्ली होत होती. त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी असे प्रदेश जर्मनीत असले पाहिजेत.
युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान नेव्हिल चेम्बरलेन बरोबरच्या चर्चासत्रात हिटलरने अनेक पुरावे दाखवले ज्यानुसार जर्मनीच्या शेजारी राष्ट्रातील जर्मनवंशीय लोकांवर अत्याचार होत होते. या सबबीवर हिटलरने असे प्रदेश जर्मनीत समाविष्ट करण्याचा आग्रह धरला.
हिटलरच्या या युक्तिवादाला जर्मन जनतेचा पूर्ण पाठिंबा होता. जर्मनीला पहिल्या महायुद्धात नामुष्की पत्करावी लागली होती. व्हर्सायच्या तहातील काही कलमे जर्मनीच्या आर्थिक व सैनिकी विकासाला जाचक होती. याच सुमारास जगभर आर्थिक मंदी सुरू होती, त्याचा प्रभाव जर्मनीवरही पडला होता. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीला सैन्य बाळगण्यावर कडक निर्बंध होते व प्रत्येक सैनिकी हालचालीबद्दल लीग ऑफ नेशन्स द्वारे परदेशी राजवटींना जबाब द्यावा लागत होता. ततः जर्मनीत गरीबी, बेकारी व असंतोषाचे लोण सर्वदूर पसरलेले होते. याचे भांडवल करून हिटलर व नाझी पक्षाने सत्ता मिळवली व हळूहळू लोकशाही व्यवस्थेत बदल करून अधिकाधिक हुकुमशाहीगत व्यवस्था जर्मनीत आली. नाझींनी जर्मनीला पटवून दिले की अनिर्बंध सत्तेशिवाय जर्मनीचा उद्धार कोणीही करू शकणार नाही. हळूहळू हिटलरने र्हाइनलँड व रुह्र प्रदेशात सैन्य उभारणीलाही सुरुवात केली. याशिवाय अश्या अनेक कृती केल्या ज्या व्हर्सायच्या तहाविरुद्ध होत्या परंतु जर्मन राष्ट्रहितकारक होत्या. याचा परिणाम जर्मन जनता हिटलरच्या मागे एकमुखाने उभी राहण्याचा झाला.
हिटलर व नाझी पक्षाने याचे पूरेपूर फायदा घेतला. जर्मनवंशीयांवर अन्याय होत असल्याचे भासवून त्यांनी याकाळात अनेक इतरवंशीय व्यक्तींचे (रोमा जिप्सी, ज्यू, इ.) सर्रास शिरकाण सुरू केले.
युरोपीय देशांची अति-सहिष्णुता व युद्धापूर्वीचे मैत्री-करार
जर्मनी व सोवियेत संघाचे पोलंडवर आक्रमण
खोटे युद्ध
अटलांटिकची लढाई
[संपादन] पॅसिफिक रणांगण
चीन-जपान युद्ध
दुसरे चीन-जपान युद्ध
[संपादन] युद्धाची सुरुवात - ई.स. १९४०
[संपादन] युद्ध पसरले - ई.स. १९४१
[संपादन] तिढा - ई.स. १९४२
[संपादन] बदलते वारे - ई.स. १९४३
[संपादन] युद्धाचा अंत - ई.स. १९४५
[संपादन] हताहत, नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार
[संपादन] गुप्त कारस्थाने व भूमिगत सशस्त्र चळवळी
[संपादन] युद्धाचे परिणाम
[संपादन] हे सुद्धा पहा
- पहिले महायुद्ध
दुसरे महायुद्ध | ||||||||||
घटनाक्रम | ठळक घटना | काही लेख | सहभागी देश | |||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्वघटना:
मुख्य रणभूमी:
साधारण घटनाक्रम:
|
१९३९:
१९४०:
१९४१:
१९४२:
१९४३:
१९४४:
१९४५:
|
नागरिकांवरील प्रभाव व अत्याचार:
पर्यवसान:
|
दोस्त राष्ट्रे अक्ष राष्ट्रे |
|||||||
|
||||||||||
Template:Tnavbar |
[संपादन] बाह्यदुवे
हा लेख इंग्लिश विकिपिडीयावरील या लेखावर आधारित आहे